मुंबई | वार्ताहर

ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटूंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करून त्यांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णयाचे जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा महसूल विभागाच्या मार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बीड, अहमदनगर यांसह विविध जिल्ह्यातील ऊसतोड मजूर जे पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भाग यासह राज्यातील विविध भागात अडकलेले आहेत त्यांना आता स्वगृही परत जाता येणार आहे. यासाठी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे सतत प्रयत्नशील होते. मागील मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी याबाबत व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी होत मागणी केली होती तसेच सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी व पाठपुरावा केला होता. राज्यातील ३८ साखर कारखान्याकडे सुमारे १,३१,००० ऊसतोड कामगार तात्पुरत्या निवारा गृहात आहेत, तर अन्य काही ऊसतोड मजूर कारखाने बंद झाल्यामुळे गावी परतत असताना संचारबंदी मुळे रस्त्यात अडकून पडले आहेत. कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी कारखाना प्रशासनाकडून १४ दिवसांपेक्षा जास्त काळ निवारागृहात राहिलेल्या मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय तपासणी करून प्रमाणित करून त्याची माहिती त्यांच्या संबंधित जिल्हा प्रशासनाला व संबंधीत ग्रामपंचायतीला देण्यात येईल व त्यानुसार त्यांना आपापल्या गावी परत जाता येईल. यासाठी लागणारी परवानगी संबंधित कारखाना प्रशासन काढून देईल. त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी, त्या त्या गटाचे मुकादम व मजुरांच्या संबंधित गावचे सरपंच यांच्याशी समन्वय साधून मजूर, त्यांचे कुटुंबीय यांना त्यांच्या जनावरांसहित सुखरूप त्यांच्या गावी पोहोच करावे. असे या आदेशात म्हटले आहे.

परतीच्या प्रवासासाठी मुकादमाच्या मदतीने गावनिहाय गट तयार करावेत, त्यांच्या गाव परतीचा इव्हाक्युएशन प्लॅन तयार करून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना माहितीस्तव पाठवावा. संबंधित जिल्हाधिकारी/ तहसीलदार यांच्या मान्यतेने मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोच करणे, त्यांच्या भोजन, पाण्याची व्यवस्था करणे यासह सर्व जबाबदारी संबंधित साखर कारखान्यांची असेल असेही या निर्णयाद्वारे आदेशीत करण्यात आले आहे.प्रत्येक गटप्रमुख/ मुकादमाने परतीच्या प्रवासादरम्यान कारखाना प्रशासनाने मिळवून दिलेले परतीचे परवाना पत्र सोबत बाळगावे असेही या आदेशात म्हटले आहे. तसेच गावोगाव परतणाऱ्या कामगारांची एकूण संख्या, नावे तसेच आरोग्य तपासणी बाबतची माहिती संबंधित ग्रामपंचायत, तसेच त्या त्या जिल्हा प्रशासनाला कळवावी असे खरबदरीचे उपायही या निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत.

ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर - धनंजय मुंडे
ऊसतोड कामगारांचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा. असे आवाहनही ना. मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.