जालना । वार्ताहर
गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये जर अधिकचा पाऊस पडला तर हा विसर्ग अजुन वाढवावा लागेल. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, पुर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व नागरिकांनी शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी एकत्रित मिळुन गावकर्यांची काळजी घेण्याचे आवाहन करत कुठलीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना सतर्क राहून त्याबाबतच्या उपाययोजना त्वरेने करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
Leave a comment