राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा
जालना । वार्ताहर
फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना पानशेंद्रा येथे 3 दिवसांपूर्वी घडली होती. या दलित भावंडांच्या हत्याकांडातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली. यावेळी त्यांनी पिडीत कुटुंबाचे सांत्वन करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या न्यायासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा पप्पू कागदे यांनी दिला.
कागदे यांनी आज पानशेंद्रा येथे जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या घटनेमागील सुत्रधारांचा शोध लावावा, पीडितांना न्याय मिळवून याप्रकरणात ऍड. उजवल निकम यांची नेमणूक करून हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे आणि पीडितांना 50 लाख रुपये मदत द्यावी, असे ही कागदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याचबरोबर बोराडे कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी कागदे यांनी केली. बोरडे कुटुंबातील सदस्यांना शासकीय मदत देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे या कुटुंबाची भेट घेणार असल्याचेही कागदे म्हणाले. पप्पू कागदे यांनी पीडित कुटुंबियांच्या नातलगांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात जाऊन भेट दिली. यावेळी पीडित कुटुंबांनी झालेल्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ऍड. ब्रह्मांनंद चव्हाण, सुधाकर रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, एन.जी.गायकवाड, विजय खरात, सुरेश खरात, सिद्धार्थ चव्हाण, महेंद्र रत्नपारखे, आकाश पांजगे, अविनाश जोगदंड, राकेश पंडित,देवा ढोले, कार्तिक ढेपे, कृष्णा नरवडे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment