कृषि संचालक डॉ.डी.एल.जाधव, राजेसाहेब देशमुख यांचेकडून पाहणी
अंबाजोगाई । वार्ताहर
येथील प्रयोगशील शेतकरी किसनराव भोसले यांनी वर्षभर कॅन्सर या दुर्धर आजारावर योग्य औषधोपचार केले. कॅन्सरवर मात करून सेंद्रिय बागायती शेतीला प्राधान्य देत साडे सहा एकरांत केळी हे पीक घेतले आहे. त्यांच्या या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी विभागीय कृषि संचालक डॉ.डी.एल.जाधव आणि जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी भेट घेवून केळीची पाहणी करून कौतुक केले. भविष्यात सेंद्रिय शेतीतून प्रगती कशी साधता येईल याबाबत शेतकरी किसनराव भोसले यांना मार्गदर्शन केले.
बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घ्यावा. राज्य सरकारने शेतकरी बांधवांचा आर्थिक फायदा झाला पाहिजे या विधायक भूमिकेतून निर्णय घेत शेतक-यांना थेट बाजारात भाजीपाला व फळे विकण्यासाठी परवाने दिले आहेत. जेणेकरून मध्यस्थांची साखळी तोडून शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे अशी माहिती विभागीय कृषि संचालक डॉ.एल.जाधव यांनी दिली.याप्रसंगी शेतकर्यांच्या गटाचे प्रतिनिधित्व करताना जि.प. सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी मानवी जीवनाला घातक ठरतील असे कीटकनाशके वापरणार्या शेतकर्यांना किंवा अशा शेतकर्यांच्या गटांना फळे व भाजीपाला विक्रीचे परवाने देवू नयेत.तर सेंद्रिय व नैसर्गिक शेती करणारे शेतकरी गटांना परवाने द्यावेत अशी मागणी केली. किसनराव भोसले या शेतक-याने जून- 2018 मध्ये साडेसहा एकर क्षेत्रांत जी-नाईन या जातीच्या केळीची लागवड केली.सध्या बाजारात फळांचे बीट बंद आहे.लॉकडाउनमुळे बाहेरच्या बाजारात ही माल घेऊन जाता येत नव्हता.त्यामुळे या बिकट परिस्थितीचा सामना करीत स्वता:च स्टॉल लावून किसनराव भोसले हे केळी विकत आहेत.याकामी त्यांना धनंजय व संजय या मुलांची मोठी मदत मिळत आहे.यावर्षी केळीची 8 हजार झाडे चांगली जोपासली.यंदा केळीला चांगला माल लागला.भोसले यांचा बागायती शेती व केळी पिकावर सुमारे साडे आठ लाख रूपये एवढा खर्च झाला आहे.
आदर्श सेंद्रिय शेती
किसनराव भोसले यांनी सेंद्रिय शेतीत प्रयोग सुरू केले. 15 दिवसांपासून अंबाजोगाई शहरात ते सेंद्रिय केळी विकत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी बांधवांनी भोसले यांचा आदर्श समोर ठेवून सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे अशी प्रतिक्रिया यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केली.
सेंद्रिय शेतीने जीवनमान सुधारेल
लॉकडाउनमुळे केळीकडे व्यापारी फिरकेना झाला होता.त्यामुळे या स्थितीवर मात करून नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय पध्दतीने उत्पादित केलेली व नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी स्वतःच विक्री करीत आहोत. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले तर शेतीचा पोत व शेतकर्याचे जीवनमान सुधारेल असे किसनराव भोसले म्हणाले.
Leave a comment