स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला आहे मतदार म्हणून मतदान टक्केवारी मात्र खूप मागे आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने किमान मतदान टक्केवारीचा अमृत कलश किमान 75 टक्के भरण्याची मतदारांकडून अपेक्षा ठेवू याबाबत हा खास लेख
|
मध्यवधी निवडणूक आणि त्याचा इतिहास असं म्हणताना आजवरच्या निवडणुकांच्या प्रवासात अनेक बाबींचा आढावा केवळ आकड्यांच्या आधारेच घ्यायचा ठरवला तर अनेक गोष्टी रंजक आहेत तसेच देशातील लोकसंख्या विस्तार तसेच साक्षरता प्रमाण आणि आयुर्मान यांच्यासोबत निवडणुकीबाबत असणारी मानसिकता या बाबी समोर येतात.
एका बाजूला आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत पण लोकशाहीचे फायदे घेत जगणारे आपल्याच लोकशाहीबाबत सकारात्मक भूमिका घेत नाहीत हे आजवरच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.
एकाच मताने बहुमत बदलणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेत मतांचे महत्त्व वेगळं सांगायला नको अशा स्थितीत जर अर्धे मतदार या प्रक्रियेत सहभागी होत नसतील दुर्लक्ष करीत असतील तर काय?
देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक 28 ऑक्टोबर 1951 ते 29 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झाली त्यावेळी पात्र मतदारांची संख्या 17 कोटी 32 लाख 12 हजार 343 इतकी होती. मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये याचा विचार करून यावेळी मतदानाचे नियोजन करण्यात आले होते. देशभरातील 25 राज्यांमध्ये एक लाख 96 हजार 84 मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती व तब्बल 68 टप्प्यांमध्ये मतदान झाले.
मतदारांनी मतदानासाठी पुढे यावे यासाठी अगदी पहिल्या निवडणुकीपासून जनप्रबोधन करण्यात येत असते तरी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे मतदानाचा टक्का आजवर गेलेला नाही. आपण स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात 75 वर्षे साजरी केली आणि लवकरच पहिल्या सार्वत्रिक मतदान कार्यक्रमालाही 75 वर्षे होतील मात्र आजवर मतदानाचा टक्का 75 पर्यंत कधीच गेलेला नाही.
आजवरच्या मतदानाच्या टक्केवारीतून आणखी एक बाब प्रकर्षाने समोर आली आहे ती म्हणजे स्त्री- पुरुष यांच्याही मतदानात बरीच तफावत आहे. यात अर्थात दर हजारी असलेले महिलांचे प्रमाण देश पातळीवर सध्या 960 इतके आहे या बाबीकडे लक्ष दिले तरी महिलांचे मतदान देखील महत्त्वाचे आहे असेच नव्हे तर प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.
8 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या नोंदीनुसार आपल्या देशात नोंदणी झालेल्या एकूण मतदारांची संख्या 96 कोटी 88 लाख 21 हजार 926 इतकी आहे
नोंदणी झालेल्या पुरुष मतदारांची एकूण संख्या 49 कोटी 72 लाख 31 हजार 944 इतकी आहे. मतदान नोंदणीनुसार देशातील स्त्री मतदाराची संख्या 48 कोटी 15 लाख 41 हजार 888 आहे. या दोघांची तुलना करता लक्षात येईल स्त्री मतदारांची संख्या तुलनेत साधारण 2.5 कोटीहून अधिक फरकाने कमी आहे.
पहिल्या दोन निवडणुकांमधील स्त्री- पुरुष मतदान आकडेवारी स्वतंत्रपणे उपलब्ध नाही. तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्थात 1962 साली झालेल्या निवडणुकीत 63.31 टक्के इतके मतदारांनी मतदान केले.
त्यावेळी स्त्री मतदान फक्त 46.63 टक्के इतके कमी नोंदले गेले होते.
त्यापुढील काळात चित्र दाखवणारा तक्ता
मतदानाचे वर्ष |
पुरुष मतदान |
स्त्रियांचे मतदान |
चौथी लोकसभा 1967 |
66.73 |
55.48 |
पाचवी लोकसभा 1971 |
60.09 |
49.11 |
सहावी लोकसभा 1977 |
65.63 |
54.91 |
सातवी लोकसभा 1980 |
62.16 |
51.22 |
आठवी लोकसभा 1984-85 |
61.2 |
58.6 |
नववी लोकसभा 1989 |
66.13 |
57.32 |
दहावी लोकसभा 1991-92 |
61.58 |
51.35 |
अकरावी लोकसभा 1996 |
62.06 |
53.41 |
बारावी लोकसभा 1998 |
65.72 |
57.88 |
तेरावी लोकसभा 1999 |
63.97 |
55.64 |
चौदावी लोकसभा 2004 |
61.66 |
53.3 |
पंधरावी लोकसभा 2009 |
60.24 |
55.82 |
सोळावी लोकसभा 2014 |
67.09 |
65.3 |
सतरावी लोकसभा 2019 |
67.01 |
67.18 |
या कडेवारीवरून स्पष्टच आहे की, तुलनेत स्त्रियांचे होणारे मतदान गेल्या 2 निवडणुकापर्यंत 60 टक्यांच्या खालीच राहिलेले राहिलेले होते. मात्र 2014 च्या निवडणुकीपासून यात बदल झाला आहे. पुरुषांच्या तुलनेत कमी असले तरी 2014 च्या निवडणुकीत स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविल्यामुळे त्यांची टक्केवारी प्रथमच 60 टक्के ओलांडून थेट 65 टक्क्यावर आली.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तर पुरुषांच्या मतदानापेक्षा स्त्रियांच्या मतदानाची टक्केवारी अधिक होती. स्त्रियांनी या मतदानात टक्केवारीत आघाडी घेतली मात्र एकूण स्त्री मतदार नोंदणी कमी असल्याने प्रत्यक्ष मतसंख्येत असणारी तफावत व अंतर कायमच आहे. स्त्री मतदानाची टक्केवारी हेच सांगते की मतदार जागृतीचे निवडणूक आयोगाचे उपक्रम यशस्वी होत आहेत.
आपण सकारात्मक भूमिकेतून मतदान वाढीचा विचार करताना आपणास इथेच थांबून चालणार नाही. परंतु या मतदानात तरी हा टक्का आपल्याला पहिल्यांदा अमृत महोत्सव करताना दिसावा ही अपेक्षा बाळगावी लागेल व त्यासाठी मतदानात सहभाग नोंदवावा लागेल. आपण एक चढती वाटचाल करीत आहोत तथापि लोकशाहीचे शिखरं गाठण्यासाठी आपल्याला आणखी प्रयत्न करावे लागतील…. और भी है मंजिले बाकी राही..., म्हणत या राष्ट्रीय कामात सक्रिय सहभाग नोंदवु या व लोकशाहीला अधिक मजबूत करू या…!
प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी बीड
चलभाषा क्र.9823199466
Leave a comment