गेवराई । वार्ताहर
कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारची संचारबंदी लागू असल्याने जिल्ह्यातील बैल बाजार ही बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना बैल खरेदी करता येत नाहीत. शेती कामाला सुरुवात झाली असताना, बैल बारदाना उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, काही गरजू शेतकर्यांनी बैल खरेदी साठी सोशल नेटवर्किंगचा वापर करून बैल मालकांशी संपर्क करण्याची नवी शक्कल लढवली आहे.
बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बैलाचा बाजार भरतो. जिल्ह्यातील राजेगाव, पात्रूड, नाथापूर , नेकनुर, हिरापूर व वडवणी येथील बैल बाजार प्रसिद्ध आहे. हिरापूर येथे बाजार भरतो. हिरापूरच्या बाजारात आठवड्याच्या दर मंगळवारी लाखो रुपयांची उलाढाल होते. बाजारात खिल्लार, गावरान, जलसी, मशान, शिंगाळू ,जाफराबादी सह वेगवेगळ्या जातीच्या म्हैस- बैलाची खरेदी विक्री केली जाते. टॅम्पोतून बैलाची ने-आण केली जाते. बाजाराचे ठिकाण राष्ट्रीय महामार्गावर असल्याने, मराठवाड्यातील शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येतात. शेतकर्यांना ग्रामपंचायत स्तरावर काही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
जून महिन्यात पावसाळा सुरू होतो.त्या आधी शेती कामाला सुरुवात झालेली असते. एप्रिल आणि मे महिन्याच्या आत नांगरणी, पाळ्या , वेचणीची कामे पूर्ण करून घेण्यासाठी धडपड सुरू असते. सध्या ट्रॅक्टर द्वारे नांगरणी सुरू आहे. काही शेतकरी एप्रिल महिन्यात बैल खरेदी करून, शेतीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न असतो. परंतू , कोरोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून, शहर व ग्रामीण भागातील बाजार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना बैल खरेदी करता येत नसल्याचे चित्र आहे.हिरापूर मध्यवर्ती ठिकाण असून, या बाजाराचा अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फायदा होतो.येथील व्यवहार खुप गंमतीशीर असतो. बाजारातील दलाल ताकात तूर लागू देत नाहीत,त्यामुळे सामान्य माणूस या व्यवहारात गोंधळून जातो, कारण दलाल हातावर रूमाल धरून व्यवहार करतात. कोणी भाकरी बांधून व्यवहार करतो, परंतू हातावर भाकरी नसते, अशी माहिती एकाने सांगितली.
बाजाराचे आणखी एक वैशिष्ट्य
दर मंगळवारी विविध ठिकाणाहून येणारे शेतकरी तसेच खरेदी व्यवहार करणार्या दलालांची येथे मोठी गर्दी असते. राहुट्या टाकुन उभी असलेली हॉटेल दर बाजारी उपलब्ध असतात, कंदुरी मटन, गरमागरम बाजरीची भाकरी, हिरापूर बाजाराचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे, या चवदार मेनुचा आस्वाद घेण्यासाठी दूरवरून येणार्या ग्राहकांची मोठी वर्दळ असते.कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे, बैल बाजार बंद असून, शेतकर्यांना बैल खरेदी करता येत नाहीत. शेती कामाला सुरुवात झाली असताना, बैल बारदाना उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, काही गरजू शेतकर्यांनी बैल खरेदी साठी सोशल नेटवर्किंगचा वापर करून बैल मालकांशी संपर्क करण्याची नवी शक्कल लढवली आहे.जिल्ह्यातील काही युवा शेतकर्यांनी सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून बैल खरेदी करण्याची नवी शक्कल लढवली आहे. फेसबुक, ट्विटर, वॉटसप च्या माध्यमातून बैल जोडी हवी आहे. बैल बारदाना असलेल्या शेतकरी मालकाने संपर्क साधावा. मध्यस्थ किंवा दलालाने अजिबात संपर्क करू नये, अशा आशयाचे मेसेज सध्या सगळी कडे व्हायरल झाले आहेत.(संग्रहित फोटो)
Leave a comment