आष्टी । वार्ताहर
कोरोनाच्या प्रलयामुळे सगळ्याच गोष्टीवर परिणाम झाला असून, ग्रामीण भागातील शेतकरीही यातून सुटले नाहीत. दुष्काळी परिस्थितीत मोठ्या कष्टाने हातातोंडाला आलेला भाजीपाला कोरोनामुळे जनावरांच्या पुढे खायला घालण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे खर्च केलेले पैसेही निघणार नसल्याने अडचणीत भर पडणार आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर भाजीपाला विक्रीला येईल, अशा नियोजनावर ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपल्या शेतात पाण्याच्या बजेटवर थोडे-थोडे तरकारीची लागण करतात. त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक शेतकरी थोडी नगदी उलाढाल होईल, असे प्रयत्न करतात. त्यात निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळी परिस्थिती यावर मात करून मोठ्या जिद्दीने आपली शेती फुलवतात.आष्टी व परिसरातील शेतकर्‍यांनी यंदा वांगी, कोथिंबिर, मेथी, कोबी ,चिकू संत्रा,डाळिंब,यासह अनेक पिके पिकविली आहेत. आता उन्हाळ्याचा चांगला दर मिळेल, या आशेवर असणार्‍या शेतकर्‍यांच्या नशिबी कोरोनामुळे तरकारी जनावरांना घालण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मोठ्या जिद्दीने पिकविलेली पिके संचारबंदीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी तोडून जनावरांना टाकत आहेत. शेतकर्‍यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील आठवडा बाजार अक्षरश: ओस पडले आहेत. भाजीपाला मिळणे मुश्कील झाले असून सर्वत्र संचारबंदी सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. एरवी गजबजलेले चौक व सार्वजनिक ठिकाणे कोरोनाच्या भीतीने ओस पडले आहेत. चीनमधून संक्रमित झालेल्या कोरोना विषाणुमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. शासनाने साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. याअंतर्गत शाळामहाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक कोरोनाला प्रतिबंध करण्याचा उस्फुर्तपणे प्रयत्न करत आहेत.
एरवी गजबजलेले चौक, पारकट्टे व सार्वजनिक ठिकाणे निर्मनुष्य झाले आहेत. अगदी दररोज गप्पा मारणारे मित्रही एकमेकांना टाळू लागले आहेत. कोरोनाच्या दहशतीचा सर्वात मोठा फटका आठवडा बाजारांना बसला आहे. गेल्या पाच सहा दिवसांत आठवडा बाजार रिकामे पडले आहेत. बाजाराकडे व्यापारी व ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. काही गावात बाजारच रद्द करण्यात आले आहेत. यामुळे लोकांना भाजीपाला मिळणेही मुष्कील झाले आहे. विक्रीअभावी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.यासह शीतपेयगृहे, हॉटेल, रस्त्याकडेने असलेले चहा, भजीच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे या छोट्या व्यासायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यस्थेवर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका उभा राहिला आहे.ग्रामीण भागातील मंदिर समाजमंदिर एरव्ही गजबजून गेलेली असायची मात्र आता कोरोनाची भीती व संचारबंदी यामुळे घराबाहेर सहसा कोणी पडत नसुन घरातच बसून दिवस काढत आहेत.याचा सर्वाधिक फटका वृद्ध व्यक्तीला बसत आहे. आष्टी तालुक्यात संत परंपरा मोठी असून तालुक्यात अनेक संत होऊन गेले आहेत.त्यांचे समाधी स्थळ सध्या संचारबंदी मुळे ओस पडले आहेत.कडा येथील मदन महाराज मंदिर,महेश मंदिर,श्रीराम मंदिर,खंडोबा मंदिर,आष्टी येथील पिंपळेश्वर मंदिर तसेच नाथांची संजीवन समाधी असलेले सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ गड आदी ठिकाणी संचारबंदी मुळे वस पडले आहेत एरवी या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते तसेच या ठिकाणचे पूजा आरत्या फक्त पुजारी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.संचारबंदी शिथिल करण्याची वेळ सकाळी सात ते साडेनऊ असल्यामुळे यावेळेत किराणा दुकानांसमोर लांब लांब रांगा पाहावयास मिळत आहेत तसेच भाजीपाला खरेदी साठी ही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.