मुंबई । वार्ताहर
गुरूवारी राज्यातील विविध राजकीय नेत्यांशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील एकंदरीत परिस्थिती आणि कोरोना संकट यासंदर्भात चर्चा केली त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व इतर काही नेत्यांनी राज्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक व ईतर काही जिल्ह्यासंदर्भात चिंता व्यक्त करून उपाययोजना राबविण्याचे सुचित केले होते. परराज्यातील कामगारांना घरी पाठविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची सूचना सर्वांनीच केली होती त्याची अंमलबजावणी राज्यसरकारने सुरू केली आहे. याच बैठकीत राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात विविध नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार राज्यामध्ये 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढु शकते असे संकेत स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच 31 मेपर्यंत राज्यातील सर्व जिल्हे ग्रीन झोनमध्ये आणण्याचे आदेश प्रशासकीय अधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, असं सांगण्यात येतं.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांचीही तपासणी करण्याची सूचना केली आहे. तसेच अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यावर भर देण्याची सूचनाही केली आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरी, अलुतेदार-बलुतेदार, बेरोजगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतानाच सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग असा शब्द प्रयोग करण्याची विनंती केली आहे.
Leave a comment