भूकंप झाल्याची अफवा; नागरिकांनी घाबरु नये-प्रशासनाचे आवाहन
बीड । वार्ताहर
बीड शहर आणि परिसर मंगळवारी (दि.6) रात्री 8 वाजून 22 मिनिटांनी प्रचंड मोठ्या गुढ आवाजाने हादरला. अनेकजण या आवाजाने घराबाहेर पळत आले तर काहींना हा आवाज म्हणजे भूकंप असल्याचे वाटले. अन् प्रत्येकाने एकमेकांना विचारणा सुरु केली. मात्र हा आवाज नेमका कशाचा होता? याची पुष्टी होवू शकली नाही, हा आवाज म्हणजे भूगर्भीय हालचाल आणि जमिनीतील हवेच्या पोकळीतून झाला असल्याची चर्चा होत राहिली.
बीड परिसरात हा गुढ आवाज अनेकांनी ऐकला. आवाज आला तेव्हा घरातील लोक बाहेर येवून काय झाले याचा कानोसा घेत राहिले तर जे रस्त्यावरुन ये-जा करत होते, त्यांनाही हा आवाज ऐकू आला मात्र तो नेमका कशाचा? याची खातरजमा करता आली नाही. या आवाजाबद्दल अनेकांनी मोबाईलवरुन एकमेकांना विचारणा केली. बीड तहसील प्रशासनाकडेही याबाबत रात्रीपर्यंत कोणतीही माहिती नव्हती. नागरिकांकडूनच आम्हाला हे कळले असल्याचे महसूल कर्मचार्यांनी सांगितले. दरम्यान यापूर्वीही काही वर्षांपासून बीड परिसर अशाच गुढ आवाजाने हादरला होता. तेव्हाही तात्कालीक चर्चेनंतर हा विषय मागे पडला होता. आता पुन्हा त्याची पुर्नरावृत्ती झाली.
नागरिकांनी घाबरु नये प्रशासनाचे आवाहन
दै.लोकप्रश्नने याबाबत बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी सांगितले की, आवाजानंतर अनेकांनी फोन करुन आमच्याकडे विचारणा केली. त्यानंतर आम्ही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क करत माहिती जाणून घेतली असता भू वैज्ञानिक रोहन पवार म्हणाले, हा आवाज म्हणजे भूगर्भातील पाणी पातळी कमी-जास्त झाल्यानंतर पोकळी निर्माण होते, त्यावेळी हवेचा दाब तयार झाल्यानंतर जमिनीतून असे आवाज येतात.
Leave a comment