मुंबई । वार्ताहर
देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये 71 टक्के लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यातही राज्यातील बहुतेक प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाहीत. अशी माहिती इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सूत्रांनी दिली आहे.
राज्यामध्ये 72 टक्के प्रकरणांमध्ये लक्षण दिसत नाहीत. फक्त 23 टक्के रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणं दिसून आलीत अशी माहिती आयसीएमआरच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. शिवाय राज्यातील 5 टक्के प्रकरणं गंभीर आहेत, तर राज्यातील मृत्यूदर 3.5 टक्के आहे. असंही आयसीएमआरच्या सूत्रांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यात काल, रविवारी नव्या 3 हजार 41 रुग्णांची भर पडली. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने केरळ सरकारकडे वैदकीय मदत मागितली आहे.
तर रविवारी दिवसभरात राज्यातील 1196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दुसरीकडे, देशात 24 तासांत 6977 नवे रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर पोहोचला आहे. तर देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Leave a comment