बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई नजीक गढीजवळ भीषण अपघातात सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. अपघाताची ही घटना सोमवारी (दि.26) रात्री 10.30 ते 10.45 वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच गेवराई पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या माहितीनुसार, आयशर टेम्पोने टोचन करुन नेण्यासाठी चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना भरधाव वेगात धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर टेम्पोसह चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई येथील यश आतकरे यांच्या वाहनाला अपघात झाला होता. हे वाहन टोचन करुन आणण्यासाठी गेवराईतील बाळु आतकरे, भागवत परळकर, सचिन नन्नवरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव आणि दिपक सुरय्या हे वाहन टोचन करुन आणण्यासाठी गढी कारखान्यानजिक गेले होते. तिथे वाहन टोचन करण्यासाठी महामार्गावर ते उभे असताना बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या भरधाव आयशर टेम्पोने चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा तरुणांना जोराची धडक दिली, त्यामध्ये या सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. सदरील आयशर टेम्पोने नंतर त्याच घटनास्थळापासून पुढे जवळपास 25 जणांना धडक दिल्याचे घटनास्थळी बोलले गेले. दरम्यान गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
--------------
Leave a comment