सहा दिवसांनरत ‘लालपरी’ धावली रस्त्यावर
विभागप्रमुख मोरेंकडून गुलाबपुष्प देवून प्रवाशांचे स्वागत
बीड । वार्ताहर
मराठा आरक्षण मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्यात 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर अशी सहा दिवस एसटी बससेवा बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती पुर्वपदावर आली. शुक्रवारी (दि.3) सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील सर्व बसेस पुन्हा प्रवाशांच्या सेवेत सुरु झाल्या. महत्वाचे हे की, यावेळी बीड विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी बसमध्ये जावून प्रवाशी नागरिकांना गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले.
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनाला सोमवारी बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. नेत्यांची घरे-कार्यालये पेटवून देतानाच बीड बसस्थानकात उभ्या असलेल्या बसेसवर तुफान दगडफेक केली गेली. यात महामंडळाच्या 61 बसेसची तोडफोड झाल्याने 70 लाख रुपयांचे नुकसान झाले. दुसरीकडे जिल्ह्यात आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 28 ऑक्टोबर रोजी बीडजवळ बीड आगाराची बीड-कोल्हापूर बस जाळण्यात आली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा बंद ठेवण्यात आलेली आहे ती 2 नोव्हेंबरपर्यंत बंदच होती. या दरम्यान जिल्ह्यात रा.प.मंडळाच्या बसेसचे बुडालेले दैनंदिन उत्पन्न, बसेसचे नुकसान तसेच अधिकारी-कर्मचार्यांच्या पगाराचा बोजा असे तब्बल 4 कोटी 49 लक्ष रुपयांचा नुकसान बोजा महामंडळाला झाला आहे. दरम्यान नुकसानग्रस्त एसटी बसेस दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असून हिमाचलप्रदेशातून काचा बसवण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती एसटीचे बीड विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना दिली. आता बससेवा सुरु झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरळीत झाल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. बस सुरु झाल्याने प्रवाशात समाधान व्यक्त झाले.
Leave a comment