आता राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार!
राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. आता या पुरस्काराला हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून याची माहिती दिली आहे. भारताच्या पुरुष संघाने नुकतंच ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं आहे. त्यातच मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील क्रीडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असं करण्यात आलं आहे. लोकांच्या भावनांचा आदर राखून हा निर्णय़ घेण्यात आला असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. आणखी एक ट्विट करताना त्यांनी म्हटलं की, ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने आपली छाती अभिमानाने भरून आली आहे. विशेषता हॉकी संघाच्या कामगिरीने विजयासाठी केलेला संघर्ष आणि कष्ट सध्याच्या तसंच भविष्यातील तरुणांसाठी मोठी प्रेरणा असणार आहेत

मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीतील योगदान
मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जातं. मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये 13 गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे 1936 मध्ये अखेरचं ऑलम्पिक खेळलंय होतं. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी 39 गोल केले होते.
मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात 1991-92 मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये 1928 अमस्टर्डम, 1932 लॉस एंजेलिस आणि 1936 बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.
हॉकीचे जादूगार
मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता. त्यांना हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून आजही ओळखलं जातं.
बॉक्सिंगमध्ये मोहम्मद अली, फुटबॉलमध्ये पेले आणि क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कर्तृत्वाने जी उंची गाठली, त्याच प्रकारची कामगिरी मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये करून ठेवलेली आहे.
ध्यानचंद यांनी 1928 मध्ये अॅमस्टरडॅम, 1932 ला लॉस एंजेलिस आणि 1936 च्या बर्लिन ऑलंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व केलं होतं.
मेजर ध्यानचंद यांचे अनेक किस्से आजसुद्धा सांगितले जातात. पण 1936 च्या बर्लिन ऑलंपिकमध्ये ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्ताव फेटाळण्याचा किस्सा अविस्मरणीय आहे.
हिटलरची घसघशीत ऑफर नाकारली
मेजर ध्यानचंद यांचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाचा तो सुवर्णकाळ होता. मेजर ध्यानचंद यांचा खेळ आवडल्यानं जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात मोठं पद देऊ केलं आणि जर्मनीसाठी हॉकी खेळण्यास सांगितलं.
ध्यानचंद त्यावेळी भारतीय लष्करात लान्स नायक या कनिष्ठ पदावर कार्यरत होते. पण जर्मन सैन्यातल्या मोठ्या पदाची ऑफर ध्यानचंद यांनी स्पष्टपणे नाकारली.
"मी भारताचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळे भारतासाठीच कायमचा खेळत राहीन," असं ध्यानचंद नम्रपणे हिटलरला म्हणाले.
ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांच्या मनात तर त्यांच्या कित्येक आठवणी जशाच्या तशा कोरल्या गेल्या आहेत. अशोक कुमार हेसुद्धा हॉकी खेळाडू होते. अशोक यांच्या गोलच्या बळावरच भारताने 1975 साली पाकिस्तानला हरवून हॉकी विश्वचषक जिंकला होता. बीबीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या होत्या.
1972 मध्ये भारतीय हॉकी संघ जर्मनी दौऱ्यावर होता. मैदानावर सराव करत असताना काही लोक एका माणसाला स्ट्रेचरवर घेऊन त्याठिकाणी आले. त्या स्ट्रेचरवरच्या व्यक्तीने थेट अशोक कुमार यांना गाठलं.
त्या व्यक्तीने आपल्यासोबत काही वर्तमानपत्रातली कात्रणं आणली होती. त्यामध्ये बर्लिन ऑलंपिकदरम्यान छापून आलेल्या बातम्या त्यांनी अशोक कुमार यांना दाखवल्या.
"हे बघा, असे होते तुमचे वडील!" असं ती व्यक्ती म्हणाली.
पद्मभूषण'नं गौरव
अशोक कुमार सांगतात, "त्यावेळी ध्यानचंद यांचं विशेषत्व काय असेल, तर ते ब्रिटिश सैन्यात होते, शिपायापासून मेजर पदापर्यंत पोहोचले होते. त्यावेळी भारत इंग्रजांच्या सत्तेखाली होता."
स्टिकमध्ये चुंबक असल्याचं म्हणत अनेकदा ध्यानचंद यांची स्टिक बदलण्यात आली.
हॉकीच्या या महान खेळाडूचं 3 डिसेंबर 1979 रोजी दिल्लीत निधन झालं. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मेजर ध्यानचंद यांना 1956 साली 'पद्मभूषण' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी केली जातेय. माजी गृहराज्यमंत्री तसंच विद्यमान क्रीडा मंत्री किरण रिजुजू यांनीही 'भारतरत्न'साठी मेजर ध्यानचंद यांची शिफारस करण्यात आल्याचं काही वर्षांपूर्वी म्हटलं होतं. मात्र, अद्याप मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात आलेला नाही.
भारतरत्न देण्याची मागणी
भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, अद्याप त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं नाही. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याला देण्यात आलेला आहे.
टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची अतुलनीय कामगिरी
सध्या जपानमध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं अतुलनीय कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं कांस्यपदक मिळवलं आहे. तर महिला संघाचं कांस्यपदक थोडक्यात हुकलं आहे.
मेजर ध्यानचंद कोण होते?
हॉकीचे जादूगार संबोधले जाणारे मेजर ध्यानचंद आपल्या खेळासाठी जगभरात लोकप्रिय होते. तितकेच आपल्या निडरपणासाठीही त्यांना ओळखलं जायचं.
जर्मनीचा हुकूमशहा हिटलरची ऑफर धुडकावून लावल्यामुळे ध्यानचंद यांची खूप मोठी चर्चा त्या काळी झाली होती.
मेजर ध्यानचंद त्यांच्या काळात प्रचंड लोकप्रिय होते. बर्लिन ऑलंपिकच्या 36 वर्षांनंतर मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार एकदा जर्मनीला हॉकी खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक व्यक्ती चक्क स्ट्रेचरवर त्यांना भेटण्यासाठी आली होती.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment