खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या विषय असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्पात 527 कोटी 63 लाख 88 हजार रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वे मार्गासाठी हा निधी मंजूर केल्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. यासंदर्भात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची रेल्वेमार्गाच्या कामासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकताच देशाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडला. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात देशातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी या अर्थसंकल्पात 527 कोटी 63 लाख 88 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वे मार्गाच्या कामाला निधीची कमतरता भासू नये व प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला,त्यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने पाचशे सत्तावीस कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.
केंद्र व राज्य सरकारने या रेल्वे प्रकल्पासाठी समान निधी देणे अपेक्षित आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना त्यांनी राज्याच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दिला,पंकजाताईंच्या पाठपुराव्याने राज्य सरकारचा निधी मिळत राहिल्याने रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली होती.परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि दोन वर्षाच्या काळात राज्याकडून रेल्वेच्या कामासाठी निधीच मिळाला नाही.परिणामी रेल्वे प्रकल्पाच्या कामात अडथळे आणि दिरंगाई आली.
सध्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या तळमळीने केवळ केंद्र सरकारचा निधी मिळत आहे.त्यांच्या पाठपुराव्याने एकूण अठ्ठाविसशे कोटींपैकी केंद्राच्या वाट्याचा असलेला अर्धा निधी जवळपास उपलब्ध झाला आहे.प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या वाट्याचा निधी देणे आवश्यक आहे.दरम्यान केंद्र सरकारने दिलेला निधी आणि खा.प्रितमताई मुंडे यांनी केलेला पाठपुरावा रेल्वेच्या कामाला गती देणारा असल्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांमधून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment