शिरूर कासार । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात निलंबित झालेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचे परवाने कायमस्वरुपी रद्द करुन त्यांच्यावर कलम 420, 379, 406, 120(ब), जीवनावश्यक कायदा तसेच क्रिमीनल ब्रिच ऑफ ट्रस्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र हा लॉकडाऊनच्या महाभंयकर संकटाशी लढत आहे. गरीब व सामान्य मजुरावर उपासमारीची वेळ आलेली असताना शासन त्यांना मदत करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारमार्फत गरीब लोकांना मोफत व अल्पदरात धान्य पुरवठा करत आहे. परंतु काही स्वस्त धान्य दुकानदार दरम्यानच्या काळात कमी धान्य देणे, धान्य वाटप न करणे, असे प्रकार करुन मढ्यावरचे लोणी खान्याचा प्रकार करत आहेत. अशा अनेक स्वस्तधान्य दुकानदाराच्या तक्रारी, लाभार्थ्यांकडून येत आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांचे परवाने देखील निलंबित झाले आहेत. परंतु त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करुन त्याच्यावर गुन्हे नोंदवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केली आहे.
Leave a comment