बीड । वार्ताहर
गेल्या दोन आठवड्यापासून ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावामध्ये सोडण्यावरून चांगलेच राजकारण तापले होते. अखेर या ऊसतोड कामगारांना सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यावरून हे ऊसतोड कामगार आपापल्या गावी निघाले आहेत. काल कोल्हापुर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यावरून बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार 54 एसटी बसेसमधून बीडकडे निघाले आहेत. ते उद्या बीड जिल्ह्यामध्ये पोहचतील. दरम्यान जिल्ह्यात पोहचल्यानंतर पुन्हा त्यांना होमक्वारंटाईन करण्यात येणार आहे. जवळपास तीनशे ऊसतोड कामगार उद्या जिल्ह्यात पोहचत आहेत.
कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतुकीचे पर्याय बंद आहेत. अशातच राज्यभरात ऊसतोड कामगार लॉकडाऊन काळात घरापासून दूरवर अडकले होते. त्यात अवकाळी पाऊस आणि इतर समस्यांमुळे ऊसतोड कामगारांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यास राज्य सरकारने ऊसतोड बांधवांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड बंधू-भगिनींना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने आणि प्रशासन यांच्या सहकार्याने कोल्हापुर जिल्ह्यातील एकूण 14 हजार 239 कामगारांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये योग्य ती काळजी घेऊन पाठविण्यात येणार आहे. यामधील महिला आणि बालकांसाठी विशेष 54 एसटी बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हळूहळू बसेसच्या संख्या वाढणार आहेत.
मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी जाण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर बीड, हिंगोली आणि परभणीसाठी साधारणत: एसटी महामंडळाच्या 130 बसेस सज्ज झाल्या होत्या. मात्र, एसटी बसेसला लागणार्या आर्थिक तसेच तांत्रिक विषयावरील वादावरून एसटी बसेसच सोडण्याचे फिस्कटल होते. त्यामागचे कारण म्हणजे ऊस मजुराकडे त्यांचे संसार उपयोगी साहित्य पेट्या, कोंबड्या, गाई, म्हशी शेळ्या सायकल असल्यामुळे त्या वस्तू पाठविण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, यावर मार्ग काढत ज्या मजदुरांकडे पाळीव प्राणी नाहीत अशाना पहिल्या टप्प्यात घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे यामधील महिला आणि बालकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
कामगारांच्या आरोग्याची होणार तपासणी
ऊसतोड कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार साखर कारखान्याचे पदाधिकारी कामगारांना गावी घेऊन जात असताना साखर कारखान्यात त्यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहेत. त्यानंतर त्यांच्या जिल्हात प्रवेश केल्यानंतर स्थानिक प्रशासना मार्फत सुद्धा चाचणी करून ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सुद्धा सूत्राने दिली आहे.
ReplyForward
Leave a comment